मुंबई- देशात आणि राज्यात कोरोनाविरोधी लढत असताना केला काही दिवसात ऑक्सिजन तुटवड्यामुळे जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. शासनाने आज दिलासादायक निर्णय घेऊन ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज मंत्रालयातून काढण्यात आली.
![oxygen supply vehicles treated as ambulance](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-oxygen-vehicle-mumbai-7204684_14092020200617_1409f_1600094177_94.jpg)
राज्यात कोरोनाबधितांची आणि मृतांचीही संख्या वाढत आहे. वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनांकडून सतर्क होऊन महत्त्वपूर्ण पाऊल उचलली जात आहेत. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचाा दर्जा दिला आहे. त्या वाहनांना जीपीएस आणि सायरन बसविण्यात येणार आहे.
अत्यवस्थ कोरोनाबधितांवर उपचारासाठी योग्य वेळेत ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून, उपलब्ध ऑक्सिजनच्या वाहतुकीत वाहतूक कोंडी, टोल नाक्यावरील रांगा यामुळे अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरक्षित आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी आरटीओने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांची उपलब्धता आणि सुरळीत वाहतूक यासाठी समन्वय साधण्याचे काम आरटीओ निरीक्षक करणार आहेत.