मुंबई : मंत्रालयात सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्य सरकारला या घटनेनंतर खडबडून जाग आली आहे. दरम्यान, मंत्री व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळा सर्वसामान्य जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवाव्यात. तशा पाट्या दालनाबाहेर लिहाव्यात, असे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
सर्वसामान्यांसाठी वेळ राखीव ठेवा : राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आपल्या कामाची दाद मागण्यासाठी मंत्रालय गाठतात. अनेकदा सतत खेटे मारावे लागतात. लांबून आल्यानंतर देखील मंत्री व अधिकाऱ्यांकडून वेळ मिळत नाही. परिणामी नैराश्य आल्याने काहीजण टोकाचे पाऊल उचलतात. सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी मंत्रालय आणि परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे येथील एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्य सरकार या घटनानंतर खडबडून जागे झाले. दरम्यान, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी नव्याने परिपत्रक काढून सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी वेळेचे नियोजन करावे, असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार असून त्यांच्या आदेशानुसार हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
परिपत्रकात दिलेल्या सूचना : राज्यातून येणाऱ्या जनतेला भेट देण्यासाठी मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. तसेच आठवडा, पंधरवडा, महिना यातील ठराविक दिवस आणि वेळ अभ्यागतांना देण्यात यावी. मंत्रालय अधिकाऱ्यांनी कामाच्या दिवशी दुपारी तीन ते चार ही वेळ सर्वसामान्य जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी. या वेळेत शक्यतो कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊ नयेत, अशा सूचना परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.
जनतेचे प्रश्न सोडवा : तसेच विभागीय पातळीवर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस जनतेसाठी निश्चित करावेत. त्याबाबत वेळ ठरवावी, लोकांच्या भेटीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने बैठका, दौरे नियोजित करावेत, असेही निर्देश दिले आहेत. या भेटीचा दिवस आणि वेळेची माहिती देणारे फलक कार्यालयाच्या समोरील भागात लावावेत. आपल्या महत्त्वाच्या कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या जनतेला रिकाम्या हाताने पाठवू नका, अशा सूचनाही परिपत्रकांतून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Girish Bapat Death : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनावर 'या' राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक