मुंबई - काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर देशातील १२ हजारांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱया २५ कोटी लोकांना त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ७२ हजार रूपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ही घोषणा ऐतिहासिक व क्रांतीकारी आहे. या घोषणेतून काँग्रेसची सर्वसामान्यांप्रतीची कटिबद्धता अधोरेखीत झाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
या घोषणेबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन करून खासदार चव्हाण म्हणाले, की देशात काँग्रेसचे सरकार आल्यावर या घोषणेची अंमलबजावणी सुरु होईल. त्यानंतर या देशातील एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूत गरजांसाठी इतरांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. काँग्रेस पक्षाने मनरेगासारखा कायदा आणून प्रत्येक हाताला काम दिले. शिक्षण हक्क कायदा आणून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. अन्न सुरक्षा कायदा आणून या देशात कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची तजवीज केली आणि आता प्रत्येकाला किमान उत्पन्न देण्याच्या दिशेने काँग्रेसने पावले उचलायला सुरूवात केली आहे. काँग्रेस पक्षाची घोषणा ही जुमलेबाजी नसते तर वचन असते आणि कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे. युपीए सरकारच्या काळात देशातील १४ कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेच्यावर आणले गेले. देशातील ५ कोटी गरीब कुटुंबातील २५ कोटी लोकांना या योजनेचा लाभ होणार असून ते गरिबीरेषेच्यावर येणार आहेत.
राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तसेच जनगणनेनुसार राज्यातील १७.४ टक्के म्हणजेच सुमारे २ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. हे २ कोटी लोक या योजनेचे थेट लाभार्थी असणार आहेत. या योजनेमुळे महाराष्ट्र गरिबीमुक्त होणार आहे. देशात भूखबळींच्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत नायजेरियासोबत १०३ व्या क्रमांकावर आहे. भाजप सरकारच्या काळात कुपोषण आणि भूखबळीची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्रात कुपोषणामुळे हजारो मृत्यू होत आहेत. अशा परिस्थितीत ही योजना गरिबांसाठी वरदान ठरेल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.