मुंबई - काँग्रेसची विचारधारा ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणेच समविचारी आहे. म्हणूनच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे प्रविण गायकवाड यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, यांच्यासह प्रवीण गायकवाड यांच्या नावाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भारतीय संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. ती टिकवण्यासाठी राज्यातील सर्वच समविचारी पुरोगामी समाजवादी आदी पक्ष संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.
या देशात संघवादी विचाराचे सरकार उलथून टाकण्यासाठी सर्वच पुरोगामी, पक्ष, संघटनांनी एकत्र येऊन मुकाबला करणे गरजेचे आहे. यासाठीच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे गायकवाड म्हणाले. पक्षाने आपल्याला पुण्यातून उमेदवारी दिली तर आपण हमखासपणे जिंकून दाखवु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, पुण्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.