मुंबई - पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव यांना शिवसेनेकडून संधी देण्यात अली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चौथ्यांदा जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर, सदानंद परब यांना सुधार समितीसाठी तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून यांनी भरला उमेदवारी अर्ज
मुंबई महापालिकेच्या ४ वैधानिक आणि ६ विशेष समित्यांच्या निवडणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात होतात. आज स्थायी समितीसाठी यशवंत जाधव, शिक्षण समितीसाठी संध्या दोशी आणि सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, बेस्ट समितीसाठी शिवसेनेकडून आशिष चेंबूरकर यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाकडून कोण ?
भाजपकडून स्थायी समितीसाठी राजेश्री शिरवाडकर, शिक्षण समितीसाठी पंकज यादव, सुधार समितीसाठी स्वप्ना म्हात्रे आणि बेस्ट समितीसाठी प्रकाश गंगाधरे यांनी अर्ज भरला आहे.
काँग्रेसचे उमेदवार
काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरिया, सुधार समितीसाठी अश्रफ आझमी यांनी आणि बेस्ट समितीसाठी विरोधी अपक्ष नेते रवी राजा यांनी अर्ज भरला आहे. दरम्यान, वैधानिक समितीच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने अर्ज भरले असले, तरी काँग्रेस शेवटच्या क्षणाला आपला अर्ज मागे घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यशवंत जाधवांना चौथ्यांदा संधी
फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते व ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांना महापौरपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यशवंत जाधव नाराज असल्याने त्यांना सभागृहनेते पद देण्यात आले. स्थायी समितीला पालिकेच्या तिजोरीची चावी बोलले जाते. या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात असाव्यात, अशी अपेक्षा सर्वच नगरसेवकांची असते. जाधव यांनाही या चाव्या आपल्या ताब्यात असाव्यात, अशी अपेक्षा असताना स्थायी समिती अध्यक्षपदावर रमेश कोरगांवर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जाधव यांना महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांचा अपेक्षा भंग झाला होता. मात्र, एका वर्षातच जाधव यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. सत्ताधारी शिवसेनेकडून जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जाधव यांना चौथ्यांदा अध्यक्ष पदासाठी संधी देण्यात आली आहे. या आधी शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांनी चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे.
हेही वाचा - तुम्ही सर्कस चालवित आहात की सरकार? काँग्रेसचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना टोला
हेही वाचा - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय नजरचुकीने म्हणजे कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा!