मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना शासकीय रुग्णालयातील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. ७ दिवस क्वारंटाईनसाठी सुट्टी मिळावी या मागणीसह पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती या प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील जे.जे रुग्णालयासह २५ जिल्ह्यातील रुग्णालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. हे आंदोलन 7 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
मागण्या मान्य झाल्या नाही, तर ८ सप्टेंबरला काम बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सचिव सुमित्रा तोटे यांनी दिला आहे. राज्यभर कोविडचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी परिचारिकांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे, सध्या काम करणाऱ्या परिचारिकांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. असे असताना सरकार पदभरती, पदनिर्मिती आणि पदोन्नती याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्याचवेळी जिवाची पर्वा न करत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या परिचारिकांना केवळ ३ दिवस क्वारंटाईनसाठी दिले जात आहे. जेव्हा की ७ ते १४ दिवसानंतर लक्षणे दिसून येतात. अशावेळी परिचारिकांना संसर्गाची भीती वाटत आहे. म्हणून ७ दिवस क्वारंटाईनसाठी सुट्टी द्यावी, अशी परिचारिका संघटनेची मागणी आहे.
जोखीम भत्ता आणि सातव्या वेतन आयोगातील थकबाकी मिळावी यासह अन्य मागण्याही आहेत. या मागण्यांसाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करूनही पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे, आता आम्ही आंदोलन सुरू केल्याचे तोटे यांनी सांगितले. आजपासून आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत. पण ७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ८ सप्टेंबरला राज्यभर काम बंद करण्यात येईल. तर या दिवशीही मागण्या मान्य झाल्या नाही, तर मग बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होईल, असा इशाराही तोटे यांनी दिला आहे.
कोविड काळात रुग्णांना वेठीस धरत रुग्णसेवेवर परिणाम करणे हे आम्हालाही मान्य नाही, मात्र आता आमच्याकडे पर्यायच नाही, असे म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपले आंदोलन तीव्र केले. ८ सप्टेंबरला काम बंद आंदोलन झाले तर त्याचा फटका जे.जे, सेंट जॉर्ज, जी.टी सारख्या रुग्णालयाला आणि तेथील रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- कर्ज वसुलीच्या गैर प्रकारामध्ये लक्ष घालावं; आमदार रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी