मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana )आणि आमदार बच्चू कडू ( MLA Bachu Kadu ) यांच्यामध्ये खोक्यांच्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खोक्यांच्या मुद्द्यावर मध्यस्थी करत पडदा टाकला आहे. नाहीतर, नेमके या खोक्यांचे प्रकरण काय आहे? हे राज्याच्या जनतेसमोर आले असते. आता सध्या जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी भविष्यात नक्कीच हे प्रकरण जनतेच्या समोर येईल, अशी टीका राष्ट्रवादी-काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( NCP Spokesperson Mahesh Tapase ) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा वाद संपला ? - सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सुरू असलेला वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मिटताना दिसत आहे. आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास अडीच तास त्यांनी चर्चा केली. त्यानंतर, आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर देखील जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रवी राणा यांनी आपल्याकडून झालेले वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे, आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे.
नेमका दोघांचा काय आहे वाद - आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात झालेल्या वादातून आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदार बच्चू कडू यांनी पन्नास टक्के घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणा यांना आरोप सिद्ध करावे, असे आवाहन केले होते. जर तसे न केल्यास १ नोव्हेंबरला आपण कायदेशीर मार्गाने जाऊ, असा इशाराही दिला होता. दोन्ही आमदारांमधील वाढता वाद पाहता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी आधी फोन द्वारे दोन्हीही आमदारांना गप्प राहण्याच्या सूचना केल्या, त्यानंतर रविवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही आमदारांची समजूत काढली तसेच सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार रवी राणा यांना केलेल्या वक्तव्य मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.