मुंबई - ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे कारवाई केली जात आहे. मास्कद्वारे या आजाराला काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. यासाठी महापालिकेच्यावतीने 'मास्क नाही तर प्रवेश नाही' विषयक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोबतच दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे तर, बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादींवर देखील याच आशयाचे स्टीकर्स आणि फलक लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
तोंड व नाक योग्यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारे मास्क अर्थात मुखपट्टीचा वापर करणे, हा ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्कचा सुयोग्य व परिपूर्ण वापर व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क योग्यप्रकारे परिधान न करणाऱ्यांवर २०० रुपये यानुसार दंडात्मक कारवाई देखील सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई अधिक व्यापक व अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात झालेल्या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह महापालिकेचे सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, महापालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.