मुंबई - देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवारी) भारत बंदची हाक दिली. याला विविध ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमध्ये बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी आणि फेरीवाले या मोठ्या संघटना आहेत. मात्र, या संघटना संपात सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक राजधानीवर 'भारत बंद'चा फारसा परिणाम झालेला नाही. बँकांचे कामकाज मात्र, बंद आहे.
हेही वाचा - LIVE: व्यापारी संघटनांची भारत बंदची हाक, बंगालमध्ये आंदोलकांनी रेल्वे अडवल्या
कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशभरात संप पाळण्याचा निर्णय घेतला. या संपात देशभरातील 269 कामगार संघटना आणि इतर संघटना उतरल्या आहेत. यामुळे मुंबईमधील सार्वजनिक रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शिवसेना प्रणित कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही या बंदला पाठींबा दर्शवल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी होईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात असे घडले नाही.