मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्टमोडवर आहे. राज्य सरकारकडून येत्या 14 ऑगस्टपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर १५ टक्केच अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येतील, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

31 जुलैपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करा -
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी कोरोना संसर्ग कायम आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांना 14 ऑगस्टपर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, 14 ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाहीत. त्यामुळे बदल्यांची कार्यवाही 31 जुलैपर्यंत पूर्ण कराव्या. तसेच, विशेष कारणास्तव होणाऱ्या बदल्यांना 1 ते 14 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत परवानगी दिली जाईल. मात्र, सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम 6 अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने कराव्या, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणाची होणार त्रिसदस्यीय उच्चस्तरीय चौकशी
10 टक्के इतक्याच बदल्यांना परवानगी -
सर्वसाधारण बदल्या आणि विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या शिफारसी आणि बदली अधिनियमातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत. बदलीसाठी संपूर्ण किंवा अंशतः ऑनलाइन संगणकीय प्रणाली आहे. त्यांनी त्याचा वापर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी निश्चित केलेल्या दिवशीच हजर राहावे अन्यथा कामावर हजर न झालेले दिवस गैरहजेरी गृहीत धरण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित