मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. नव्या याचिकेत सरकारकडून परमवीर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीला आव्हान दिले आहे. परमवीर सिंह यांनी अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्राचा हा परिणाम असल्याचा आरोप करत याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. गुरुवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. राज्य सरकारतर्फे याप्रकरणी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेण्यात आल्याने उच्च न्यायालयात यावर येत्या सोमवारी (दि. 4 मे) रोजी सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मुकूल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले की, 19 एप्रिलला परमबीर सिंह यांची राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी भेट झाली. याभेटीत पांडे यांनी आपल्याला धमकीवजा इशारा दिला आहे की, अनिल देशमुख यांच्याविरोधातील पत्र मागे घ्या, जेणेकरून त्यांच्याविरोधातील खटल्याला महत्त्व उरणार नाही. तसेही तुम्ही संपूर्ण व्यवस्थेशी लढू शकणार नाही, उलट आता तुमच्या विरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल होतील, असेही सांगण्यात आले.
अकोला जिल्ह्यात बुधवारी (दि. 28 एप्रिल) परमबीर सिंह यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला आहे. याचीही माहिती यावेळी न्यायालयाला देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळेच आता त्यांना हा विनाकारण त्रास दिला जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांच्यावर अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहिलेले ते पत्र मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेतून केला.
हेही वाचा - चार महिन्याभरात ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील - किरीट सोमैय्या