मुंबई-राज्यातील रस्त्यावर भिकारी मास्क न वापरता लोकांच्या जवळ जात असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणखीन वाढू शकतो,अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका ज्ञानेश्वर धारवतकर या पुण्यातील नागरिकाने दाखल केली आहे. या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. नियमांचे पालन सुशिक्षीत लोकही करत नाहीत मग फक्त भिकाऱ्यांनाच का दोष द्यायचा, असा सवाल याचिकाकर्त्याला न्यायालयाने विचारला.
सध्या राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. मात्र, रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकराचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसून, यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने त्यांच्या याचिकेत केली होती.
भिकारीच नाहीतर सुसंस्कृत, सुशिक्षीत लोकांकडूनही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे सांगत भिकाऱ्यांनाच या बाबत दोष का द्यावा? असा प्रतिसवाल याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. यासंदर्भात राज्य शासन व पुणे महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 14 ऑगस्टला होणार आहे.