मुंबई - सरकार आणि आरोग्य विभागाने ज्या सूचना आपल्याला दिल्या आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करून कोरोनावर आपण मात करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. कोरोनाचा पराभव केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले. प्रशासन, पोलीस यंत्रणा अखंडपणे काम करत आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी सर्वांना घरी राहण्याची विनंतीही पवार यांनी केली.
राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाचे सर्व विभाग काम करत आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे एक वैशिष्ट्य आहे, की गावागावात अनेक खासगी संस्था आहेत. त्यांचेही मोठे सहकार्य या संकटावर मात करण्यासाठी मिळत आहे. या सर्व घटकांचे मी मनापासून अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले.
साखर कारखान्याच्या ठिकाणी २८ केंद्रे उभारण्यात आली असून, त्याठिकाणी २ हजार ५७५ मजूर आहेत. त्याचबरोबर पाटबंधारे खाते व इतर ठिकाणी ५७७ मदत केंद्रे असून, त्याठिकाणी १५ हजार ३२३ मजूर काम करत आहेत. अशा ३ हजार १४३ केंद्रांमधून ३ लाख ३२ हजार २६६ व्यक्तींना निवारा, अन्न, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम होत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.