नागपूर : विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा, या उद्देशानं खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत 'अॅडव्हांटेज विदर्भ'ची (Advantage Vidarbha program) सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'अॅडव्हांटेज विदर्भ'चं हे दुसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
महाराष्ट्रात 80 ते 90% सामंजस्य करार
दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य कराराबात देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विदर्भ नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध आहे. महाराष्ट्रातील 75 टक्के खनिजे आणि 80 टक्के जंगले विदर्भात आहेत. आता गडचिरोलीमध्ये खनिज संपत्तीवर आधारित विकास सुरू झाला आहे. गडचिरोलीमध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचं लोहखनिज आहे. गडचिरोलीमध्ये खनिजांवर आधारित उद्योग येत आहेत".
5 लाख कोटींचा करार विर्दभासाठी
पुढं बोलताना ते म्हणाले, "आम्ही दावोसमध्ये 15.70 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला. त्यापैकी 5 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार विदर्भासाठी आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात की सामंजस्य करार थेट गुंतवणुकीचं प्रतिबिंबित करत नाहीत. देशात थेट गुंतवणुकीत सामंजस्य करारांचं प्रमाण कमी असलं तरी, महाराष्ट्रात 80 ते 90% सामंजस्य करार थेट गुंतवणुकीत प्रतिबिंबित होतात. गेल्या वर्षी स्वाक्षरी झालेल्या 274 सामंजस्य करारांपैकी, पाच सामंजस्य करार वगळता, इतर सर्व काम विविध टप्प्यात आहेत. आम्ही केवळ कागदावर सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करत नाही, तर ते प्रत्यक्षात अंमलात आणतो". मोठी जोखमी असूनही गडचिरोलीत उद्योग आणल्याबद्दल नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले आहेत.
अमरावतीमध्ये फ्लाइंग अकादमी सुरू होणार
"गडचिरोलीमध्ये लोहखनिज उपलब्ध असलं, तरी त्याचा वापर कॉलोनी म्हणून करू नये. म्हणजेच, लोहखनिज बाहेर नेण्यासाठी आणि बाहेर कारखाने उभारण्यासाठी त्याचा वापर करू नये. आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आता गडचिरोलीमध्ये पहिला स्टील प्लांट सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा पायाभरणी देखील झाली आहे. लवकरच गडचिरोलीमध्ये विमानतळ बांधण्याचं काम सुरू होईल. चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फ्लाइंग अकादमी अमरावतीमध्ये सुरू होईल. या ठीकाणी 25,000 वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जाईल. याबाबत एअर इंडियासोबत करार झाला आहे", असं फडणवीस म्हणाले.
गडचिरोली मार्गे विदर्भाचा विकास
"जेएसडब्ल्यू जिंदाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज गडचिरोलीमध्ये एक उद्योग उभारणार आहे. पुढील 5 वर्षांत गडचिरोली हे देशाचे 'स्टील हब' असेल. गडचिरोलीहून जगभरात स्टील निर्यात केलं जाईल. रायपूर ते विशाखापट्टणम असा राष्ट्रीय महामार्ग बांधला जाईल. गडचिरोलीहून एक मार्ग जोडून, गडचिरोलीमध्ये उत्पादित होणारे स्टील थेट विशाखापट्टणम आणि काकीनाडा बंदरांवर पाठवता येईल. विदर्भ ही व्याघ्र राजधानी आहे आणि आता परदेशातून लोक वाघांना पाहण्यासाठी येत आहेत. नागपूर विमानतळ विस्तार ही एक समस्या होती. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळं नागपूर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय विमानतळ बनेल. जगात कुठेही जाण्यासाठी आता मुंबई, दिल्लीला जाण्याची गरज नाहीय", असं यावेळी बोलताना केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
प्रवाशांना 50 ते 60 कोटींचा फटका
पुढं बोलताना गडकरी म्हणाले, "मी मिहानमध्ये किमान एक लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज मला सांगताना आनंद होत आहे की मिहानमध्ये एक लाख स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचं आमचे उद्दिष्ट साध्य झालं आहे. आता लवकरच फाल्कन कंपनीचं छोटे जेट पूर्णपणे नागपुरात तयार केलं जाईल. विमानतळाच्या धावपट्टी कार्पेटरचं काम संथ गतीनं सुरू आहे. मी अधिकाऱ्यांना कळवलं आहे. आता कामाचा वेग वाढला आहे. मात्र, दिवसभर कार्पेटिंगचं काम सुरू असल्यानं विमान उड्डाणांवर परिणाम होत आहे. परिणामी, विमान तिकिटांच्या किमती वाढल्यानं गेल्या तीन ते चार महिन्यांत नागपूर प्रवाशांचं 50 ते 60 कोटींचं नुकसान झालं आहे".
जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट गडचिरोलीत
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात उत्तम दर्जाचं लोहखनिज आहे. गडचिरोली भारताच्या मध्यवर्ती भागात आहे. म्हणून, JSW ला गडचिरोलीमध्ये जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारायचा आहे. आम्ही गडचिरोलीमध्ये 25 दशलक्ष टन क्षमतेचा स्टील प्लांट उभारणार आहोत. त्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. स्टील प्लांटचा पहिला टप्पा 4 वर्षांत सुरू होईल, तर प्लांट 8 वर्षांत पूर्णपणे कार्यरत होईल, असं JSW कंपनीचे संचालक सज्जन जिंदाल यांनी म्हटलं आहे.
हा महोत्सव कोकणातही आयोजित करावा
यावेळी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, "दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचं काय झालं,? असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो. दावोसमध्ये झालेल्या 15 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराचा कालावधी कायमस्वरूपी आहे. त्यामुळं लाखो तरुणांना रोजगार मिळेल. खासदार उद्योग महोत्सव केवळ विदर्भातच नव्हे, तर आपल्या कोकणातही आयोजित करावा". या कार्यकर्माला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, जेएसडब्लू कंपनीचे संचालक सज्जन जिंदाल उपस्थित होते.
हे वाचलंत का :