मुंबई : भांडी घासून मिळणाऱ्या अत्यल्प पैशांमध्ये घर कसं चालवायचं? असा प्रश्न आमच्या समोर होता. पण, लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", अशी भावना धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली. ते ऐकताच, "ही योजना कधीही बंद पडणार नाही!" अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
"लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने "जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले. मुख्यमंत्र्यांनी या महिलांच्या भावना जाणून घेल्या. "लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय," असं आश्वासन दिलं. राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजना तसेच इतर काही योजनांमुळं ताण असल्याचं बोललं जातय. त्यामुळं या योजना बंद करणार, अशी कुजबूज सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना या सर्व चर्चांना पुन्हा एकदा पूर्ण विराम लावला आहे.
काय म्हणाल्या महिला? : “भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, याचा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेनं आम्हाला मोठा आधार मिळाला,” असं म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. "आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली," असं एका महिलेनं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी : या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, "सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत." यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "शासन पातळीवर या मागणीचा विचार करू," असं सांगितलं. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्यानं त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -