मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा काही तासांतच मृत्यू झाला. यामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले हे पोलीस कर्मचारी मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी बंदोबस्त कामी हजर होते. यादरम्यान यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांना मुंबईतील वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा अकादमी येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची सर्व तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता. गुरुवारी त्यांच्यावर वरळी येथे निवासस्थानी आल्यावर परिसरातील नागरिकांनी त्यांचा स्वागत सुद्धा केले होते. मात्र, घरी गेल्यानंतर केवळ चार तासातच त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याला खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून उपचार घेऊन डिस्चार्ज घेताना यांची प्रकृती उत्तम होती, असे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, उपचार घेऊन घरी आलेल्या त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
हेही वाचा - मलकापुरात आणखी एक महिला कोरोनाबाधित, आकडा 56वर
महानगर पालिकेच्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असेल व त्यास कुठलीही गंभीर लक्षणे नसतील तर, 10 दिवसांच्या उपचारानंतर त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना टेस्ट न करता घरी पाठविण्यात येते. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असू शकतो. त्यानुसार आम्ही तपास करीत असल्याचे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.