मुंबई - शहरातील कोरोनाचा पहिला मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाचा कहर आता कमी होत चालला आहे. इतकेच नव्हे तर, आता धारावीतील रुग्णवाढीचा दर थेट 30 दिवसांवर आणण्यात मुंबई महानगर पालिकेला यश आले आहे.
धारावीतील रुग्ण दरवाढीचा दर 20 दिवसांवर आणण्याचा निर्धार पालिकेने केला होता. त्यानुसार पालिकेने धारावीतील रुग्णवाढीचा दर 20 दिवसांवर आणलाच पण त्याही पुढे जात तो 30 दिवसांवर आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे, धारावीकरांसह मुंबईकरांसाठी ही गुड न्युज आहे.
धारावीसारख्या दाटलोकवस्तीत कोरोना शिरल्याने आणि त्याचा कहर वाढतच चालल्याने एप्रिलपासूनच येथील अनेक परिसर प्रतिबंधित म्हणून जाहीर करत ते बंद करण्यात आले होते. जितक्या उपाययोजना करता येतील त्या करण्यात आल्या. अगदी डोअर टू डोअर स्क्रिनिंग, क्लिनिक-स्क्रिनिंग करत अनेकांचे विलगीकरण करण्यात आले.
या सर्व उपाययोजना अखेर कामी येताना दिसत आहेत. कारण जिथे 50 ते 80 रुग्ण रोज आढळत होते तिथे आता 18 ते 45 दरम्यान रुग्ण आढळत आहेत. एकूणच येथील रुग्ण दरवाढीचा दर 30 दिवसांवर गेला आहे, अशी माहिती जी-उत्तरचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
तर, महत्त्वाचे म्हणजे दादर-माहीममध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे, पण तरीही जी-उत्तरमधील रुग्ण दरवाढीचा दर 20 दिवसांवर आल्याचेही दिघावकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी दिलासादायक आहेत.