मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने अनुयायी खारघर येथील उघड्या मैदानात चार तासांपेक्षा अधिक वेळ बसून होते. ४२ अंश सेल्सियस तापमानात आणि रखरखत्या उन्हात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो अनुयायांना उष्माघाताचा त्रास जाणवला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कार्यक्रम ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे शेड किंवा छप्पर उपलब्ध नव्हते. तसेच पिण्याचे पाणी सुद्धा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेकांना भोवळ येऊन ते जागेवरच पडले. अशामध्ये १३ अनुयायांचा मृत्यू झाला असून शेकडो अनुयायी अजूनही उपचार घेत आहेत. एकंदरीत, या प्रकरणावरून राज्य शासनाविरुद्ध टीकेची झोड उठली असून आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
केवळ सत्तेसाठी व शक्ती प्रदर्शनासाठी: प्रीती मेनन म्हणाल्या की, महाराष्ट्रात ५० खोक्यांचे सरकार आहे आणि ते सत्तेसाठी काहीही करू शकते; परंतु सत्तेसाठी, शक्तिप्रदर्शनसाठी हे सरकार लोकांच्या जीवाची आहुती देणार ही कल्पना कोणी केली नव्हती. काल (रविवारी) महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कार्यक्रम राज्य सरकारने आयोजित केला होता. वास्तविक असे कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आयोजित केले जातात; परंतु शिंदे आणि फडणवीस सरकारने याला एका राजकीय रॅलीमध्ये बदलले आणि खारघर येथे इतक्या उष्णतेच्या लाटेत भर दुपारी ही सभा घेतली. शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये निर्देश दिलेले आहेत की, उन्हाळा असतो तेव्हा सायंकाळी कार्यक्रम घेतले जावेत; परंतु राज्य शासनाने भर दुपारी उन्हात कार्यक्रम घेतला.
म्हणे, अमित शहांकडे तीच वेळ: कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावून राजकीय वातावरण निर्मिती करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे, शहांनी कार्यक्रमासाठी तीच वेळ दिली होती. सलग पाच तास जनतेला या उष्णतेच्या लाटेमध्ये विना तंबू, विना छप्पर आणि पाण्याविना बसवले गेले. यात १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजूनही मृत्यूचा निश्चित आकडा माहीत नाही; पण २०० च्या पुढे लोक रुग्णालयामध्ये आताही भरती आहेत.
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? कालचे शक्ती प्रदर्शन हे सत्तेसाठी होते. राज्य शासन लोकांची कामे करू शकत नाहीत; परंतु स्वतःच्या सत्तेसाठी, शक्ती प्रदर्शनासाठी लोकांचा जीव घेण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. कार्यक्रमात उन्हाच्या तडाख्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. लोकांचा जीव गेला तर त्यांना फक्त पाच लाख रुपये निधी देतात हे लज्जास्पद आहे, अशी टीका करत कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा? असा प्रीती मेनन यांनी विचारला आहे.