मुंबई - गेल्या काही वर्षांतील पावसाळ्यात नाल्यात पडून वाहून जाण्याच्या दुर्घटना बघता महानगरपालिकेने यंदा जागोजागी नोटीस लावल्या आहेत. मात्र, या नोटीस पाहून स्थानिक नागरिक संतापले आहेत. मुंबई महानगरपालिका नोटीस लावून आपल्या जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
काही दिवसांपूर्वीच पालिकेने गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकरनगर परिसरातील नाल्यात व मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. याची माहिती देऊन महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेची नोटीस बजावली. मात्र, यामुळे मुंबई महानगरपालिकाच टीकेची धनी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी भर पावसात रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापुरकरांचा नाहक बळी गेला. तर गोरेगाव पूर्वकडे वीटभट्टी परिसरात नाल्यात पडून दीड वर्षांचा दिव्यांश नावाचा चिमुकला वाहून गेला. त्यानंतर गेल्यावर्षी धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये राजा मेहबूब शेख हा तरूण पाण्यात पडून वाहून गेला. या घटनांवरून मुंबई महानगरपालिकेला सर्वच स्तरांतून टीकेला सामोरे जावे लागले होते.
अशा घटना घडूनही पालिकेने त्यावर ठोस उपाययोजना न करता उलट नागरिकांनाच सतर्कतेची नोटीस बजवली आहे. पालिकेने लावलेली नोटीस नागरिकांनी फाडून टाकली आहे. फक्त नोटीस न बजावता त्या नाल्यावर संरक्षक जाळ्या लावायला हव्या होत्या, असे स्थानिक नागरिक व मनसेचे शाखाध्यक्ष अरुण गवळी यांनी सांगितले.
धोकादायक नाले, मॅनहोलच्या जागी सुरक्षित जाळ्या लावून ते बंदिस्त करणे महानगरपालिकेचे काम आहे. पालिकेने लावलेल्या नोटीस काढून तेथे उपाययोजना कराव्यात, असे वॉच डॉग फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक निकोलस अलमेडा यांनी म्हटले आहे. त्यांनी तीव्र शब्दांत पालिकेच्या नोटीस लावण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.