मुंबई - जुन्नर येथील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी कार्यकर्त्यांसह आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आज या सर्वांच्या उपस्थित लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याची यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत फक्त वाघच राहू शकतात, असा टोला शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हे यांना लगावला. शरद सोनवणे तुम्ही शिवसेनेबाहेर होता. मात्र, तुमच्या मनात भगवा कायम होता, म्हणून तुम्ही स्वगृही परतला, असे ठाकरे यांनी शरद सोनावणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत उद्गार काढले.
शिवनेरीवरील भगवा उतरवण्यासाठी काही नतदृष्ट प्रयत्न करतात. त्यांनी हिंमत असेल तर तसे करून दाखवावे, असे खुले आव्हान ठाकरेंनी दिले. शिवनेरीची माती कपाळाला लावून अयोध्येत गेलो त्यामुळे राम मंदिराचा विषय पुन्हा सुरू झाला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर मतदार लोकसभा जिंकणारच सोबत शरद सोनावणे यांच्या पक्ष प्रवेशाने विधानसभाही जिंकणार, असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. युती करताना शेतकरी, नाणार प्रश्न तडीला नेले म्हणून युती केली. भाजपसोबत ५ वर्षात सत्तेत असताना दोस्ती आणि दुष्मनी दोन्हीही पाहिली. समविचारी लोकांसोबत युती केली नसती तर अविचारी डोक्यावर बसले असते. आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विजय मिळवा. पुढे विरोधकांची एबी फॉर्म भरण्याचीही हिंमत होणार नाही, असे ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांना सांगितले.