मुंबई - यवतमाळमध्ये जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणातील दोषीवर कारवाई करू, अशी ग्वाही शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. जम्मू-काश्मीरमधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरातील वैभव नगर परिसरात तुंबळ मारहाण करण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर देशात जो आक्रोश आहे, तो पाकिस्तान विरोधी आहे. मात्र याचा देशातील भारतीयांना त्रास होता कामा नये. आपण देश म्हणून एकत्र राहीले पाहिजे. आपल्या देशातच वाद झाले तर आपण पाकिस्तानला उत्तर देऊ शकणार नाही. ही वेळ एकत्र राहून पाकिस्तानला उत्तर देण्याची आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना मला कळली आहे. या घटनेची चौकशी करुन आपण दोषीवर कारवाई करु, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.