मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मात्र, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असताना त्यांना एवढ्या जागा कशा मिळाल्या? याबाबत सामान्य मतदारच चर्चा करीत आहेत. तसेच काही मतदारसंघात जास्त मतदान मोजण्यात आले आहेत. त्यासाठी ईव्हीएमविरोधात सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेते मुंबई पत्रकासंघात राष्ट्रीय जनआंदोलन करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपचे उमेदवार ३०३ मतदार संघात निवडून आलेले आहेत. त्यानंतर शेतकरी, कष्टकरी झोपडपट्टीत राहणारा, चहा वाला, फेरीवाला या सर्वांची आपने भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपला मत दिले नाही. मात्र, भाजपला एवढ्या जागा मिळाल्या हा मशीनचा चमत्कार आहे. ३७० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतांची चोरी झालेली आहे आणि या चोरीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून आले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
भाजप सरकारच्या विरोधात येत्या १२ जूनला देशातल्या संविधानावर विश्वास असणाऱ्या सामाजिक संघटना चळवळीतले कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष राष्ट्रीय जनआंदोलन करणार आहेत. त्यामाध्यमातून एक राष्ट्रीय सम्मेलन होणार आहे. यामध्ये त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसे त्याचबरोबर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्यांची भूमिका मांडतील, असे शिंदे म्हणाले.