लातूर : जिल्ह्यातील मुरुड येथे असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यला चार महिन्याची पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून, दारु व मटणाच्या पार्टीसाठी अडीच हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

अडीच हजार रुपयांची लाच घेताना अटक : लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले लोकसेवक राजेंद्र नेपाळबुवा गीरी (वय 58 वर्ष) यांनी तक्रारदारास त्याचा चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून व त्यांची पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्याकरिता दारू व मटणाच्या पार्टीसाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना लातूरातील कार्यालयात रंगेहात अटक करण्यात आली.

लातूर येथे गुन्हा दाखल : सदर प्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लोकसेवक प्राचार्य राजेंद्र गीरी ( वर्ग-1) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-1988 कलम-7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लातूरचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजितवाड हे सदर गुन्ह्याचा तपास करित आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन : सदरची कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात लातूरचे उपाधिक्षक पंडीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक भास्कर पुली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोलीस हवालदार रमाकांत चाटे, फारुक दामटे, भागवत कठारे, भीमराव आलूरे,शाम गीरी, संतोष गीरी, शिवशंकर कछवे, अशिष क्षिरसागर, दिपक कलवले, संदिप जाधव, मंगेश कोंडरे, गजानन जाधव, रुपाली भोसले, संतोष क्षिरसागर यांच्या पथकाने केली आहे. शासकीय अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षम क्षेत्रातीलच कर्मचारी आणि आदर्श व्यक्ती असल्या प्रकारचे कार्य करीत असेल तर, इतरांनी काय अनुकरण करावे असा प्रश्न निर्माण होत आहे.