निलंगा (लातूर) - उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही जमीन आमची आहे म्हणत तालुक्यातील ताडमुगळी येथील दहा जणांनी एका शेतकऱ्याला व त्याच्या मुलाला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या भीतीपोटी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मुलाने आरोपी दहा जणांवर गुन्हा दाखल करा म्हणत मृतदेह औराद पोलीस स्टेशनच्या दारात ठेवले.
याबाबत सविस्तर वृत्त असे, निलंगा तालुक्यातील ताडमुगळी येथील शेतकरी अण्णाराव कदमापुरे यांची सर्वे नंबर २२२ मध्ये २ हेक्टर ८२ आर जमीन आहे. सदरील जमिनीचा गावकरी व कदमापुरे यांच्यात वाद होता. तो उच्च्च न्यायालय व सर्वोच्च्च न्यायालयाच्या दारात गेला आणि या दोन्हीही ठिकाणी कदमापुरे यांच्या सारखाच निकाल लागला.
गावातील सुभाष अण्णाराव पाटील, पंढरी सुर्यभान हुलसुरे, धनाजी चंद्रभान हुलसुरे, आंबादास मारूती पेठे, शिवपुत्र देवाप्पा बिरनाळे, नागनाथ दिंगबर गारोळे, दिलीप मारूती गारोळे, धनाजी मधुकर गारोळे, कोंडीबा सौदागर हुलसुरे, अशोक रावण दामोदरे या दहा लोकांनी २३ जुलै रोजी शेतात येऊन आमची सर्व जनावरे सोडली व पिकांची नासधुस केली. याबाबत औराद शा. पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, याची दखल पोलिसांनी घेतली नाही नंतर २६ जुलै रोजी पुन्हा शेतात येऊन मला व माझ्या वडिलांना वरील दहा जणांनी मारहाण केली. तुम्हा दोघांना ठार मारू म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली, आम्ही कसेबसे जीव वाचवून दोघे पळून गेलो, अशी माहिती मयताचा मुलगा दत्ता अण्णाराव कदमापुरे यांनी दिली आहे.
सर्व न्यायालयात निकाल आमच्या बाजूने लागून सुध्दा हे लोक मला व माझ्या वडिलांना घरात घुसून सतत मारायची, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी द्यायचे. याच भीतीपोटी माझ्या वडिलांचा दि.३० रोजी मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत या दहा लोकांवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन पोलीस अधीक्षक लातूर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांना दिले आहे. या आरोपींवर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ठाण्यातच ठेवणार, असा पवित्रा घेतला होता. परंतु, पोलिसांनी संबंधित लोकांना बोलावून चौकशी करून गुन्हे दाखल करू, असे सांगून अंत्यविधीसाठी प्रेत नेण्यासाठी विनंती केली.