लातूर - शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील किर्ती ऑइलमिलच्या मुख्य कार्यालयाच्या मागील गोडाऊनला शुक्रवारी सकाळी आग लागली. यामध्ये बरदाना जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत जवळपास 60 ते 70 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गोडाऊनमध्ये केवळ बरदाना असल्याने संपूर्ण बाजार समितीमध्ये धूर पसरला होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किर्ती ऑइल ग्रुपचे मोठे गोडाऊन आहे. शुक्रवारी पहाटे या गोडाऊनमधून आगीचे लोट बाहेर येऊ लागले. हा प्रकार उपस्थित कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी किर्ती ऑइलमिलच्या भुतडा यांना माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन ते चार तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत 60 ते 70 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पंचनामा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.