लातूर - दुष्काळी झळा आणि पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे शेती व्यवसायाचे गणितच चुकले आहे. मात्र, अशा प्रतिकूल स्थितीमध्येही वेगळा प्रयोग आणि बाजारभावाचा अभ्यास करून औसा तालुक्यातील मछिंद्र सुगावे यांनी एक एकरात २ लाख २१ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.
बोरफळ शिवारात मछिंद्र सुगावे यांची ६ एक्कर जमीन आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि पारंपरिक पिकांमुळे दरवर्षी त्यांना उत्पादनात घट होत होती. यावर त्यांनी वेगळा पर्याय शोधत कमी कालावधीचे कोथींबिर पिकाची निवड केली. बाजारभावाचा अभ्यास करून ६ पैकी ३ एकरात त्यांनी या पिकाची लागवड केली. त्यानंतर लागवडीपासून फवारणी, मशागत आणि पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यामुळे आज त्यांच्या कोथींबिरीला लाखमोलाचा दर मिळाला आहे.
सध्या एक एकरातील काढणी जोमात सुरु असून व्यापारी थेट सुगावे यांच्या बांधावर दाखल होत आहेत. यामुळे काढणी आणि वाहतुकीचा खर्च वाचला आहे. आतापर्यंत जे पारंपरिक पिकातून उत्पन्न मिळाले नाही ते या ४० दिवसाच्या कोथींबिरीतून मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. सध्याचे वातावरण पाहता उर्वरित असलेल्या कोथींबिरीलाही योग्य दर मिळेल असा आशावाद मछिंद्र सुगावे यांना आहे.