लातूर - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी वित्त व मनुष्यहानी झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने गावालगतचे पूल वाहून गेले आहेत. असाच प्रकार जळकोट तालुक्यातील चेरा येथे घडला. पहिल्याच पावसाच्या तडाख्यात चेरा गावातील पूल वाहून गेला आहे.
चेरा गावालगतच्या पूलावरून ग्रामस्थ शहराकडे आणि शेताकडे ये-जा करतात. मात्र, गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे हा पूल वाहून गेला. या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे मुश्किल झाले आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे गरजेचे आहे. याशिवाय बि-बियाणे, खत खरेदीसाठी शहराकडे जावे लागते. मात्र, गावचा पूलच वाहून गेल्याने वाहने बंद झाली आहेत. त्यामुळे त्वरीत या पुलाचे काम करण्याची मागणी चेरा ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दक्षिण शेंद येथे दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर देवणी तालुक्यातील विजयनगर येथील तरुण दुचाकीसह वाहून गेला. वाहून गेलेल्या तरुणाचा आज मृतदेह सापडला.