लातूर - मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम बैलपोळा सणावरही झाला आहे. पोळ्यानिमित्त विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा भरल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी केवळ सणाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यावर भर दिला आहे. दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे पोळ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट होता.
दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या सणावर दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस घटते उत्पन्न आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवल्याने आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ 38 टक्के पाऊस झाला आहे.
हेही वाचा लाडक्या सर्जा-राजासाठी शेतकरी सज्ज; बैलपोळ्यासाठी बाजारपेठ सजली
यामुळे शेती धोक्यात आली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच दिवसाकाठी 200 ते 300 रुपयांची पदरमोड करून जनावरे जगवावी लागत असल्याने शेतकरी सर्व बाजूने संकटात आहे. यामुळे जिल्ह्यात बैलपोळ्याचा उत्साह कमी झाला आहे.
हेही वाचा 'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा सजल्या होत्या. मात्र, विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. सणाच्या दिवशी जनावरे धुण्यासाठीही पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.