लातूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला मंगळवारी सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून शेतीशी संबधित स्टॉल लावण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागातून शेतकरी लातूरमध्ये दाखल झाले आहेत.
मागील आठ दिवसांपासून या कृषी प्रदर्शनाची तयारी केली जात होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने जिल्ह्यातील तरुणांसह इतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र, ऐन वेळी त्यांचा दौरा रद्द झाला. लातूर हा कायम अवर्षणाचा भाग राहिला आहे. या भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या कृषी प्रदर्शनाचे आयोजन लातूर येथे केल्याचे लातूर मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती
मनसेने कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसायातील अडचणी वाढत आहेत, सरकारचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि या प्रदर्शनातून त्यांना लाभ व्हावा यासाठी पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती अभिजित पानसे यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमाला राज ठाकरे हे अनुपस्थित असले तरी समारोपाच्या समारंभाला ते उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.