कोल्हापूर - विधानपरिषदेसाठी (Maharashtra MLC Election 2021) कोल्हापुरातून सतेज पाटील ( Satej patil) यांची बिनविरोध निवड झाली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपकडून अमल महाडिकांनी (Amal mahadik) उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सुद्धा आता माघार घेतली असून वरिष्ठ पातळीवरून ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या (Kolhapur Legislative Council) जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमल महाडिक व शौमिका महाडिक यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.
धनंजय महाडिक म्हणाले की, राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका होऊ शकल्या नव्हता. पुढे जिल्हा परिषद व 105 नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सलोखा रहावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा सुरु होती. भाजपसाठी मुंबईची जागा महत्वाची आहे, ती बिनविरोध झाली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर करावी अशी वरिष्ठांची मागणी होती. तसंच धुळे-नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजप नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे तिथे अमरिश पटेल यांचीही बिनविरोध निवड करायची, म्हणजे दोन भाजपच्या जागा. आम्हाला एक सीट अधिकची पदरात पडली आहे. भाजपच्या दोन जागा त्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी हा पक्षादेश आज झालेला आहे.त्यानुसार अमल महाडिक व शौमिका महाडिक यांचा अर्ज मागे घेतला.
राज्यात सलोखा रहावा आणि येणाऱ्या निवडणुकीतील वातावरण चांगले राहावे यासाठी निर्णय - महाडिक
राज्यात कोरोनामुळे दोन वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत मात्र येत्या काळात अनेक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यातील सलोखा रहावा राजकीय वातावरण चांगले राहावे यासाठी वरिष्ठ पातळीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत निर्णय झाला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची चर्चा सुरू होती. त्यामुळे पक्षाच्या आदेशामुळे आता अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते धनंजय महाडिक यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, अमल महाडिक यांनी सुद्धा पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे म्हटले.
मुंबई, कोल्हापूर आणि धुळे बिनविरोध -
मुंबई भाजपसाठी आणि कोल्हापूर काँग्रेससाठी अशी बोलणी सुरू होती. मात्र दुसरीकडे धुळेच्या जागेबाबत सुद्धा आग्रह धरून दोन जागा भाजपने पदरात पाडून घेतल्या आहेत असेही धनंजय महाडिक यांनी म्हंटले. ते पुढे म्हणाले, जरी निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आम्हाला अनेकांनी पाठींबा जाहीर केला होता. यामध्ये प्रामुख्याने विनय कोरे, प्रकाश आवाड़े, सुरेश हाळवणकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाडिकांचे वर्चस्व होते, आहे आणि राहणार - धनंजय महाडिक
यावेळी बोलताना धनंजय महाडिक पुढे म्हणाले, यापूर्वी आम्ही सर्वजण महाडिक कुटुंब म्हणून निवडणूक लढवत होतो मात्र आता आम्ही सर्वजण भाजप पक्षाच्या माध्यमातून एकनिष्टपणे एकत्र राहणार आहे. शिवाय यापूर्वी सुद्धा महाडिक कुटुंबाचे वर्चस्व होते आहे आणि राहणार असेही महाडिक यांनी म्हटले.