कोल्हापूर : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील दुधगंगा नदीपत्रात आज सकाळी पोहायला गेलेल्या नागरिकांना नदीचे पाणी कमी झाल्याने नदीपात्रात चार मानवी कवट्या आढळून आल्या. याबाबत नागरिकांनी तात्काळ पोलीस पाटील उद्धव पोतदार यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील पोद्दार यांनी तात्काळ कागल पोलिसांना घटनेची माहिती दिली. कागल पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
चार कवट्या आढळल्याने खळबळ : दुधगंगा नदीपत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणी कमी झाले आहे. यामुळे सकाळी पोहायला गेलेल्यांना या कवट्या आढळून आल्या. एकाच ठिकाणी चार मानवी कवट्या सापडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुधगंगा नदी पत्रात कवट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
अघोरी कृत्याचा संशय : काही दिवसांपूर्वीच सिद्धनेर्ली, बामणी या गावांमध्ये परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आले होते. आता एकाच ठिकाणी चार मानवी कवट्या आढळून आल्याने हा अघोरी कृत्याचा तर प्रकार नाही? एकाच वेळी चार मानवी कवट्या कशा सापडल्या, त्या इथे कुणी आणल्या, या परिसरात जादूची कला सुरू असल्याने कुणी केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या कवट्यांमधून गूढ निर्माण झाले आहे.
कवट्यांची फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी : गेल्याच महिन्यात सांगली जिल्ह्यातील तरुणाचा वडिलांनीच खून करून शेजारच्या बामणी गावाच्या हद्दीमध्ये मृतदेह टाकला होता. यामुळे सिद्धनेर्ली आणि बामणी गावच्या नागरिकांच्यामध्ये घाबराटीचे वातावरण पसरले आहे.सिद्धनेर्ली नदी किनारा येथील दुधगंगा नदीपत्रात आढळलेल्या मानवी कवट्या जप्त करण्यात आल्या असून या मानवी कवट्यांची फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या कवट्या त्याच ठिकाणी कोणी टाकल्या याचाही तपास पोलीस करत आहे.