कोल्हापूर : नुकतेच बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान झाले आहेत. मात्र, कोल्हापुरातील एका गावात गेल्या 900 वर्षांपासून एक बाप्पा विराजमान असून आजही इथल्या ग्रामस्थांवर त्यांचा आशीर्वाद आहे. इथले नागरिक आजही या बाप्पाला नमस्कार करूनच दिवसाची सुरुवात करत असतात.
कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील तुळशी आणि भोगावती नदीच्या संगमावर कसबा बीड हे छोटसं गाव वसलेलं आहे. या गावातील लोकसंख्या जवळपास पाच हजाराच्या घरात आहे. या गावाला मोठा इतिहास लाभला असून 900 वर्षांपूर्वी शिलाहार वंशातील गंडरादित्य राजाचे या गावात वास्तव्य होते, असे म्हणतात. अनेक ग्रंथांमध्ये याबाबतचे संदर्भ आढळतात. गावात आजही सापडत असणाऱ्या शिलालेख आणि वीरगळ यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात. या गावाच्या मध्यभागी महादेवाचं भव्य-देखणं मंदिर असून याच्या प्रवेशद्वारावर एक शिलाहारांच्या गणपतीचेही छोटंसं मंदिर आहे. शिलाहार राजा गंडरादित्य हा गणेश भक्त होता म्हणूनच त्याने गणपतीचे मंदिर गावात बनवले होते असे बोलले जाते.
आजही गावात शिलाहार गणपती मंदिराबरोबरच आणखी काही मंदिरेसुद्धा पाहायला मिळतात. या मंदिरांना 900 वर्षे उलटून गेली तरी त्यातील सर्व मूर्ती आहे त्या अवस्थेत आणि सुस्थितीत पाहायला मिळतात. यापैकी शिलाहार गणपती मंदिरातील मूर्ती एकाच शिळेमध्ये कोरण्यात आली असून जवळपास 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद व आकाराची ही सुबक, भारदस्त अशी मुर्ती आहे. मूर्तीमध्ये गणपतीची डाव्या बाजुला सोंड असून दोन्ही दंत अर्धे आहेत. त्यामुळे इतर मूर्तींपेक्षा ही मूर्ती वेगळी दिसून येते. या शिलाहाराच्या बाप्पावर इथल्या नागरिकांची प्रचंड श्रद्धा असून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
याच गणपतीच्या मंदिरामागे महादेवाचे सुद्धा 900 वर्षांपूर्वीचे भव्य आणि टुमदार मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून स्थापत्य वास्तुकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. मंदिर परिसरात विविध शिलालेख, वीरगळ आणि पुरातन मूर्ती आढळतात. कसबा बीडचे मुख्य आकर्षणच इथे सापडल्या जाणाऱ्या वीरगळ आहेत. गावात आत्तापर्यंत शेकडो वीरगळ आणि मूर्ती सापडल्या आहेत. यातील काही मूर्ती आणि विरगळीचे महादेव मंदिर परिसरात स्मारक सुद्धा करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ज्यामुळे कसबा बीड गावाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे ते म्हणजे गावात पडणारा सोन्याचा पाऊस. या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, गावात अनेकांना यापूर्वी सोन्याची नाणी सुवर्णालंकार आणि इतर काही गोष्टी सापडल्या असून अजूनही सापडत आहेत. रोजच्या उठ-बस असणाऱ्या ठिकाणी, शेतात काम करताना, सततच्या वर्दळीच्या ठिकाणी, घरांच्या कौलावर सोन्याची नाणी सापडल्याची उदाहरण आहेत. म्हणूनच कसबा बीडमध्ये सोन्याचा पाऊस पडतो आणि ही फक्त नशिबवानालाच सापडतात अशी आख्यायिका रूढ झाली आहे. या सोन्याच्या नाण्यांना कसबा बीडचे नागरिक 'बेडा' असे म्हणतात. कसबा बीड गावाला प्राचीन वैभव आणि मोठा इतिहास लाभला आहे. प्राचीन काळचे शिल्लक अवशेष, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा आणि आख्यायिका गावाने आजही जपल्या असल्याचे गावात गेल्यानंतर आपोआपच जाणवते.