पालघर- जिल्ह्यात रस्त्यासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला. त्याबाबत त्यांनी पुराव्यानिशी माहिती देत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. तसेच कार्यकारी अभियंत्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांच्या तक्रारीनुसार शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
विक्रमगड तालुक्यात जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा आढावा घेण्यासाठी विवेक पंडित यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत आदिवासी विकास कामांचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजनेतून रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला.
चौकशी अहवालात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न- रस्ते गैरव्यवहाराची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे निर्देश पंडित यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता विष्णू बोरसे आणि शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांनी अहवाल सादर केला. माजी आमदार विवेक पंडित यांच्या माहितीनुसार अहवालात बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. एकाच रस्त्याचे फोटो अनेक ठिकाणी वापरून रस्त्याचं काम झाल्याचं दाखवण्यात आलं. हे निदर्शनास आल्यानंतर आढावा बैठकीतच पंडित यांनी तत्कालीन उप अभियंता आणि शाखा अभियंत्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले होते.
शाखा अभियंत्यांवर गुन्हा दाखल-उपविभागीय अभियंत्यांनी चौकशी करून याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार केली. जिल्हा परिषदेचे उपअभियंता मनोज अंभोरे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोकाटे यांच्या विरोधात अनेक कामांच्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा आणि बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला.
‘या’ रस्त्यांची कामे न करताच बिले हडप- तक्रारीनुसार हातणे कारेल पाडा रस्ता, देहजे हातणे रस्ता, उटावली माळे रस्ता, हातणे रस्ता, कुंर्झे-हातणे रस्ता, वसुरी-मलवाडा रस्ता या रस्त्याच्या कामा संदर्भात विवेक पंडित यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारीनुसार या रस्त्यांची कामे अपूर्ण असतानाही अन्य ठिकाणचे फोटो जोडून रस्त्यांची कामे झाल्याचं दाखवण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात त्रुटी आढळून आल्या आहेत.
अधिकाऱ्यांना चाप- विवेक पंडित यांनी पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे अखेर उपअभियंत्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी शासनाची फसवणूक करून गैरव्यवहार करतात. परंतु त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसतो. विवेक पंडित यांच्या कणखर भूमिकेमुळे चुकीच्या प्रकारांना आळा बसेल, अशा विश्वास नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.