मुंबई - देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे निगवे गावचे सुपुत्र हुतात्मा संग्राम पाटील आणि बहिरेवाडी गावचे सुपुत्र हुतात्मा ऋषिकेश जोंधळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पाटील यांनी हुतात्मा संग्राम पाटील यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि हुतात्मा ऋषिकेश जोंधळे यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द पूर्ण केला
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरे गावचे सुपुत्र हृषिकेश जोंधळे आणि करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील यांना सीमेवर रक्षण करताना वीरमरण आले. हृषिकेश जोंधळे यांचे कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. तर संग्राम पाटील यांना दोन मुले असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी हृषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना पक्के घर बांधून देण्याचा शब्द पाटील यांनी दिला होता. तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी दोन्ही कुटुंबांना मदत करत चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द पूर्ण केला.
प्रजासत्ताक दिनी जोंधळे कुटुंबीयांसाठी बांधण्यात येणाऱ्या पक्क्या घराचे भूमीपूजन तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. तर संग्राम पाटील यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाखांचा निधी संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात आला. या निधीचा धनादेश माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते पाटील कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.