कोल्हापूर - महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. अनेकांनी शड्डू ठोकून प्रचाराला सुरुवात केली आहे. पण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करण्यासाठी चक्क भानामतीचे राजकारण सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेमका काय आहे हा प्रकार पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
परिसरात चर्चा
कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. हे गृहीत धरूनच प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी जोर लावायला सुरुवात केली आहे. अनेकांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला थेट आव्हान देत निवडणुकीचा शड्डू ठोकला आहे. मात्र अशा उमेदवारांना रोखण्यासाठी भानामतीचे राजकारण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील सुर्वेनगर प्रभागात घडला आहे. प्रभागातील बापूराम नगरमध्ये इच्छुकांची नावे असलेल्या कागदात लिंबू ,अंगारा, काळा दोरा, लोखंड आढळून आल्याने भानामती सारख्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कागदामध्ये प्रभागातील सर्वच इच्छुकां सह प्रचारामध्ये आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे असल्याने या प्रकाराची चर्चा परिसरात रंगली आहे. तसेच नागरिकांमध्येदेखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. असे अघोरी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
'पुरोगामी कोल्हापुरात हा प्रकार दुर्दैवी'
करवीर नगरी ही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आहे. पुरोगामी विचारांच्या नगरीत हा प्रकार होणे दुर्दैवी आहे. निवडणूक लढवत असताना उमेदवारांनी स्वतःची प्रतिमा, अस्तित्व प्रभागात उंचावणे गरजेचे आहे. मात्र भानामती करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे, हे करवीर नगरीला घातक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
आठवड्यातील हा दुसरा प्रकार
गेल्या आठवड्यात कळंबा स्मशानभूमीमध्ये काही मुलांची नावे लिंबावर लिहून त्याला टाचण्या टोचून लिंबू टाकण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. असाच प्रकार बापू रामनगरमध्ये घडल्याने कोणीतरी अज्ञानीया मागे असल्याची चर्चा परिसरात आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधितावर कडक कारवाई करत रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस गटनेत्याचे नाव आणि खळबळ
या प्रकारात काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचे नाव असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीमध्ये जवळपास १७ ते २० लोकांची नावे लिहिली आहेत. त्यामध्ये भाजपाचे प्रकाश टोनपे यांचेदेखील नाव आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात याची चर्चा सुरू आहे.