जालना - भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथुन जवळच असलेला कोठा कोळी शिवारातील पाझर तलावाचा सांडवा अज्ञात लोकांनी फोडला. त्यामुळे लाखो लिटर पाणी रोज वाहुन जात असल्याने तलाव रिकामा होत आहे. याकडे जिल्हा परिषद सिंचन विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोठा कोळी शिवारात १९७२ च्या दुष्काळात पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून येथे पाझर तलाव बांधण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील शंभर ते दोनशे हेक्टर शेती तलावामुळे सिंचनाखाली आली, यामुळे शेतीला फायदा झाला. तलावाखालील कोठा कोळी गावाचा कायमस्वरुपी पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी तलाव उभारला. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडुंब भरला होता. बर्याच वर्षाने तलावात मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतीला फायदा होणार होता. मात्र, येथील पाझर तलावाचा सांडवा अज्ञातांनी फोडला आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. सांडवा मातीच्या भिंतीशेजारुनच फोडल्याने तलाव फुटतो की काय अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. तलावाखालील कोठा कोळी या गावाला त्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी टंचाईचे चटके पुन्हा यावर्षी सोसावे लागणार असून टँकरच्या पाण्यावरच तहान भागवणार असल्याची परिस्थीती तलावाचा सांडवा फोडल्याने निर्माण झाली आहे. हा सांडवा फोडणार्या विरुध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या विषयी भोकरदन जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी एस.एम.गुटे यांना विचारले असता, सदर प्रकारणाची तत्काळ चौकशी करुन पाझर तलावाचा सांडवा फोडणार्याविरुध्द कारवाई करणार असल्याचे सांगितले.