जालना - कोरोनामुळे हातावर पोट असणारा घटक अडचणीत सापडला आहे. या घटकाचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. परिणामी, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जालना शहरात सुमारे 10 हजार गरजूंना तयार अन्नाचे पाकिटाचे प्रशासनाकडून वाटप केले जात आहे. घरोघरी जाऊन हे पाकीट विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पोहचवत आहेत.
यामध्ये नाव्हा मार्गावर असलेले 'दत्तधाम' हे यामधील 50 टक्के अन्नाची पाकिटे तयार करण्याचे काम करत आहे. एका पाकिटात 4 पोळ्या, भाजी, आणि एक गोड पदार्थ अशा पद्धतीची सुमारे 5 हजार पाकीटे 'दत्ताश्रमा'तून रोज वितरीत केली जात आहेत. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनवर 20 हजार पोळ्या तयार केल्या जातात.
तर तयार केलेले हे अन्न सामान्य माणसांपर्यंत शहरातील विविध सामाजिक संस्था पोहचवत आहेत. ठरवून दिलेल्या भागांमध्ये हे या अन्नाच्या पाकिटाचे वाटप करत आहेत. 'दत्ताश्रमा' याप्रमाणेच अन्यही सुमारे 50 संस्थाही आपल्या परीने अन्नदानाचे काम करत आहेत. या सर्व वितरण आणि उत्पादनावर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे लक्ष ठेवून आहेत.