जालना - सध्या असलेले सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांचीही मिलीभगत आहे. हे दोघेही एक दुसऱ्याला सांभाळून घेत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार वाढत असून सरकार अशा नेत्यांना पाठीशी घालत आहे. सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा पाहता या सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी चौकशीची भीती वाटत असल्याने ते भाजपमध्ये जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार ती झाली आणि स्वतः भुजबळांनी हे प्रकरण मान्य केले होते, असे असतानाही भाजप सरकारने भुजबळ यांना जामीन देण्यासाठी प्रयत्न केले आणि तो मिळवून दिला, असाही आरोप श्रीमती मेनन यांनी केला.
जालना विधानसभेचे आम आदमी पार्टीचे उमेदवार कैलास फुलारी यांच्या प्रचारार्थ प्रीती मेनन या जालण्यात आल्या होत्या. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, विरोधी पक्ष एवढा ओरडत असतानाही हे सरकार व्यवस्थित चालले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत देखील या सरकारच्या बाजूने तीव्र असंतोष असतानाही त्यांना बहुमत मिळाले कसे? हा एक चमत्कारच आहे. तो चमत्कार पाहून आम्ही देखील त्रस्त आहोत असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले, आम्ही विकासाचे करत आहोत - रावसाहेब दानवे
दरम्यान, सत्तेकडे वाटचाल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून खालच्या स्तरापासून वरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच दिल्लीमध्ये २ वेळा आमचे सरकार आले. महाराष्ट्रातही बऱ्यापैकी जागा आमच्याच येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत, अशा नेत्यांना पकडण्याची हिम्मत या सरकारमध्ये नाही. कारण हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'नेते, मतदार अन् माध्यमांनी सभेत अनावधानाने बोललेले वाक्य अथवा कृतीला महत्व देऊ नये'
या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांच्यासोबत आम आदमी पार्टी जालनाचे उमेदवार कैलास फुलारी यांच्यासह पार्टीचे वरिष्ठ पातळीवरील नेतेही उपस्थित होते.
हेही वाचा - आम्ही पैलवानांसोबत कुस्त्या खेळतो; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर