जालना - येथील मंठा तालुक्यातील खोराडसावंगी येथे २६ जुलै रोजी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमअंतर्गत ९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर लसीकरण झालेल्या नागरिकांना कॅल्शियम आणि व्हिटामिनच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. मात्र, वाटप करण्यात आलेल्या गोळ्या या मुदत संपलेल्या असल्याने, काही नागरिकांना त्याचा त्रास सुरू झाला. त्यामध्ये पोट दुखणे, उलटीचा त्रास होऊ लागल्याने यातील काही नागरिकांवर मंठा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
'जिल्हास्तरीय समितीच्या अहवालानंतर कारवाई करणार'
या घटने नंतर जिल्हाभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच, अशी घटना घडल्यामुळे सबंध आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून नागरिकांना मुदत संपलेल्या गोळ्या देण्यात आल्याने जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी सरपंचांनी केली आहे. तसेच, कारवाई नाही झाली तर आपण सबंध गावकऱ्यांच्या वतीने अमरण उपोषण करणाऱ असल्याचा इशाराही सरपंचांनी दिला आहे. तर, यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमली असून, समितीच्या अहवालानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी म्हटले आहे.