बदनापूर (जालना) - नवऱ्या मुलाने 2 लाख रुपये हुंडा घेऊन साखरपुडा पार पडला, मात्र त्यानंतर ठरवलेल्या तारखेस लग्न न केल्यामुळे नवरीची व तिच्या पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी नवरदेवासह 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साखरपुडा धडाक्यात संपन्न
बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील बाबूलाल हरी जाधव यांची मुलगी नीता हिचा विवाह औरंगाबाद तालुक्यात विजय गोविंद राठोड या मुलाबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे ठरला होता. नवरदेव - नवरीचा साखरपुडाही वधुपित्याने धडाक्यात केला. यावेळी वरपक्षाने 2 लाख रुपयांची मागणी केली असता बाबूलाल जाधव यांनी मुलीच्या सुखासाठी पैसेही दिले. मात्र, साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षाकडून विवाह करण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. ठरवलेल्या तारखेला लग्न न करता उडवा उडवी करण्यात येऊ लागली.
हेही वाचा - जालन्यात एकाच महिलेला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस; आरोग्य विभाग करणार चौकशी
वधू पक्षाची फसवणूक करीत असल्याबाबत मुलीचे वडील बाबूलाल जाधव यांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे गाठले व नवरदेव मुलगा गोविंद राठोड याच्यासह दिलीप पवार, बबन पवार, नवरदेव मुलाची बहीण सुनीता पवार (तिघे राहणार चितेपिंपळगाव, ता. औरंगाबाद), योगेश चव्हाण, श्रीचंद राठोड, वरपिता गोविंद रायसिंग राठोड, अशा सात जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील या करत आहेत.
हेही वाचा - वरुडी चेकपोस्टवर पेंडॉलमध्ये घुसली चारचाकी, तीन पोलीस जखमी