जळगाव - भडगाव तालुक्यातील अवर्षणप्रवण भागातील गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा धरणातून गेलेल्या पांझण कालव्यावर २००७ मध्ये पाटचारी बांधण्यात येणार होती. या पाटचारीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात निधी उपलब्ध न झाल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न आजही कायम आहे. या पाटचारीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
गिरणा नदीकिनारी असलेली जळगाव जिल्ह्यातील भडगाव व पाचोरा तालुक्यातील अनेक गावे अवर्षणप्रवण भागात आहेत. या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २००७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, भडगाव-पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वाघ, जिल्हाधिकारी विजयकुमार सिंघल यांनी पुढाकार घेऊन नदीजोड प्रकल्प हाती घेतला होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातून गेलेल्या पांझण कालव्यावर एक पाटचारी बांधण्यात येणार होती. या कामासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार सिंघल यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्यासाठी विशेष हेड उघडला होता. या हेडमधून मिळालेल्या निधीतून २००७ ते २०११ या काळात पाटचारीचे सुरुवातीच्या काळात ८० टक्के काम झाले. मात्र, त्यानंतर सरकार बदलले, जिल्हा नियोजन समितीने हेडही बंद केला. त्यामुळे हे काम मागे पडले. या पाटचारीचे अवघे २० टक्के काम शिल्लक राहिले आहे. त्यासाठी सुमारे ४० लाख रुपये आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी मिळावा-
पुढच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाटचारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आहे. निधी मंजूर झाला नाही तर हे काम रखडण्याची शक्यता आहे.
या गावांना लाभ होणार -
पांझण कालव्यावर बांधण्यात येणाऱ्या पाटचारीमुळे भडगाव तालुक्यातील आडळसे, पथराड, जुवार्डी, पेंढगाव अशा १० ते १५ गावांचा पिण्याचा तसेच शेतीचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. गिरणा धरणातून गेलेल्या पांझण कालव्याचे पाणी या पाटचारीद्वारे जुवार्डी गावाजवळ असलेल्या पाझरतलावात सोडले जाणार होते. तेथून आजूबाजूला असलेल्या गावांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना होती. मात्र, पाटचारीचे काम अपूर्ण असल्याने ही संकल्पना पूर्ण होऊ शकली नाही. यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आताच या पाटचारीचे काम पूर्ण करावे; जेणेकरून पुढील वर्षी या गावांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही, असे या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विद्यमान आमदारांचाही पाठपुरावा-
या प्रश्नी विद्यमान आमदार किशोर पाटील यांचाही २०१४ पासून पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडून जिल्हा नियोजन समितीचे बंद पडलेले हेड उघडायला लावले. परंतु त्या हेडमधून अद्यापही पाटचारीच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे.