जळगाव - जिल्ह्यातील भडगाव शहरात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी या तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. बब्बू सय्यद (वय ४८), पिंकी सय्यद (वय ३८) आणि नेहा सय्यद (वय १६) अशी मृतांची नावे आहेत.
सय्यद कुटुंबीय हे मूळचे नागपूरचे आहे. काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त ते भडगावात आले होते. काही दिवसांपूर्वी याच कुटुंबातील ९ वर्षीय बालक सय्यद याची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीला आली होती. त्यानंतर आता त्या मृताचे वडील, आई आणि बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्यापही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे.
मुलाचा खून कौटुंबिक वादातून?
मागच्या आठवड्यात सय्यद कुटुंबातील बालकाचा निर्घृण खून झाला होता. हा खून कौटुंबिक वादातून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या खुनाच्या घटनेचे धागेदोरे आजच्या आत्महत्येच्या घटनेशी आहेत का? याचाही तपास पोलीस करीत आहेत.