जळगाव - बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीसह तालुक्यातील 200 ते 250 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग या पिकांसह शेतांचे बांध देखील पाण्यासोबत वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी रात्री पाऊस पडला. त्यात बोदवड तालुक्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुरवाडे खुर्द परिसरात रात्री 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेकांच्या शेतातील अंकुरलेली पिके वाहून गेली. काही ठिकाणी कापसाच्या शेतातील ठिबक सिंचन संच देखील वाहून गेले आहेत. पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. शासनाकडून आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोदवडच्या तहसीलदारांनी आज सकाळी सुरवाडे खुर्द परिसराला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
पशुधनाचीदेखील झाली हानी -
सुरवाडे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची देखील हानी झाली आहे. सुरवाडे येथील शेतकरी प्रकाश कडू पाटील यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. नंतर हा बैल नाल्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळला आहे. तहसीलदारांनी या घटनेचाही पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.