जळगाव - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने देशव्यापी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सकाळ सत्रात अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु, राजकीय पक्षांनी बंद पाळण्याचे आवाहन केल्यानंतर चित्र बदलले. दरम्यान, भारत बंद आंदोलन सुरू असले तरी जळगावात सरकारी कार्यालये तसेच बँकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहेत. सार्वजनिक बस व रेल्वेसेवा देखील नियमितपणे सुरू आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा येथील हजारो शेतकरी दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला 12 दिवस उलटून देखील केंद्र सरकारच्या वतीने कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा निष्फळ ठरत असल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने देशव्यापी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनाला जळगावात सकाळ सत्रात संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेनंतर जळगाव शहरातील बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने उघडण्यात आली होती. परंतु, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून बंद यशस्वी करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. त्याला प्रतिसाद देत व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत सहभाग नोंदवला.
सराफ बाजार, दाणा बाजारात गोंधळ
मंगळवारी सकाळी 9 वाजेनंतर शहरातील दाणाबाजार, सराफ बाजार भागात दैनंदिन व्यवहारांना सुरुवात झाली. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व प्रतिष्ठाने उघडली होती. परंतु, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. व्यापाऱ्यांना दमदाटी करत त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी हस्तक्षेप करत मध्यस्ती केल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणारभारत बंद आंदोलनामध्ये जळगावातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील दाणाबाजार तसेच सराफ बाजारातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. दररोज या ठिकाणी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. परंतु, सकाळपासूनच बंदला सुरुवात झाल्याने या ठिकाणच्या सर्वच व्यवहार थांबले आहेत.आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबाया आंदोलनाला राजकीय पक्षांसह विविध सामाजिक व इतर संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. विविध संघटनांचे पदाधिकारी देखील बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र जळगावात पाहायला मिळाले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत
जळगाव शहरासह जिल्ह्यात भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी जिल्ह्यातील सार्वनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस व रेल्वे सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेली नाही. जळगाव शहरात रिक्षा सेवा देखील सुरळीतपणे सुरू आहे.