मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, केंद्र सरकार यांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात याबाबत बाजू मांडून खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (दि.३) झालेल्या सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खंडपीठासमोर केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयानं आयोगाला नोटीस बजावली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी मांडले विविध प्रश्न : सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. मात्र, त्याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर देण्यात आले अशी माहिती आंबेडकर यांनी न्यायालयाला दिली. मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजे सहा वाजल्यानंतर मतदानाची एक नियमावली आहे. रांगेतील शेवटच्या माणसाला पहिला नंबर दिला जातो आणि पहिल्या व्यक्तीला शेवटचा नंबर मिळतो. ती पाळली गेली का?, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. न्यायालयानं निवडणूक आयोगाकडं माहिती मागवली आहे, अस मतदान झाले की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता आम्ही बॉल रोल केला आहे. राज्यातील इतर राजकीय पक्ष आणि जनता यामध्ये सहभागी झाले तर, निवडणूक आयोगाला ॲक्शन घ्यावी लागेल असं ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडं असलेली खरी माहिती त्यांनी न्यायालयासमोर मांडावी अशी आपली अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.
लवकरच सुनावणी होईल : प्रत्यक्ष झालेलं (पोल) मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांची जुळवणी निवडणूक निकालात झाली पाहिजे. जर जुळवणी झाली नसेल तर, रिटर्निंग अधिकाऱ्यानं ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला पाठवणं गरजेचं असते. जिथं-जिथं पोल मतदान आणि मोजण्यात आलेली मतं जुळत नाहीत तर, त्याची माहिती निवडणूक आयोगाकडं माहिती पाठवली आहे का?, असं पाठवणं सक्तीचं आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि ज्या ज्या ठिकाणी फरक आहे. त्या ठिकाणांच्या निवडणूक निकालाबाबत न्यायालयानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी न्यायालयाकडं केली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबत न्यायालयानं नोटीस दिली असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल असं आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा :