जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱयांसमोर जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. पाऊस लांबल्यामुळे शासनाने निदान चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.
जिल्ह्यात महिनाभरापूर्वी कोरड्या चाऱ्याच्या 100 पेंढ्यांसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता पैसे देऊनही चारा मिळत नाही. अशा परिस्थितीत जनावरे सांभाळणे कठीण झाले असून इच्छा नसताना शेतकऱयांना जनावरे विकावी लागत आहेत.
एवढी बिकट परिस्थिती असतानादेखील सरकारकडून जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होत नाही. एखाद्या संस्थेने चारा छावण्यांची जबाबदारी घेऊन अर्ज करावा, असे सरकार म्हणते. मात्र ग्रामीण भागातून एकही संस्था पुढे येत नसल्याने चारा छावणी सुरू होत नाहीत.
त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेने चाऱ्याची समस्या सोडवली पाहिजे, अशी शेतकऱयांची अपेक्षा आहे. दुष्काळामुळे मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांचीदेखील ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.