जळगाव - कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटाच्या काळात जळगावातील गुलाबराव देवकर फाउंडेशन, जळगाव जिल्हा मजूर, काम फेडरेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोरगरिबांच्या मदतीसाठी धावले आहेत. गेल्या महिनाभरापासून ते जळगावातील झोपडपट्टी परिसरातील आणि खेड्यापाड्यांवरील गरजूंना घरपोच जेवणाची पाकिटे पोहोचवत आहेत. त्यांनी महिनाभरात १ लाखाहून अधिक लोकांची भूक भागवली असून, लॉकडाऊन असेपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. उद्योग-व्यवसायदेखील बंद असल्याने गोरगरिबांच्या हाताला काम नाही आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळणे दुरापास्त झाले आहे. हीच विदारक परिस्थिती लक्षात घेऊन जळगावातील गुलाबराव देवकर फाउंडेशन, जळगाव जिल्हा मजूर, काम फेडरेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून गोरगरिबांना जेवण मिळावे म्हणून अन्नछत्र सुरू केले आहे. मजूर फेडरेशनच्या कार्यालयात हे अन्नछत्र उभारण्यात आले असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गरजूला जेवण दिले जात आहे. शहर आणि तालुक्यातील झोपडपट्टी परिसरात घरपोच जेवणाची पाकिटे पोहोचवली जात आहेत. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे सव्वा लाख लोकांची जेवणाची व्यवस्था झाली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत हे अन्नछत्र सुरूच राहणार आहे. य अन्नछत्राचा संपूर्ण खर्च गुलाबराव देवकर फाउंडेशनच्या वतीने होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन -
अन्नछत्रात जेवण वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन केले जात आहे. जेवण स्वीकारणाऱ्या लोकांनादेखील तोंडाला मास्क बांधावे, जेवण घेण्यापूर्वी हात सॅनिटाइज करावे, असा आग्रह धरला जातो. विशेष म्हणजे, झोपडपट्टी परिसरात जेवण वाटप करताना देखील गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. जेवणात दररोज वेगवेगळी भाजी व पोळी असे पदार्थ दिले जात आहेत. या उपक्रमासाठी गुलाबराव देवकर फाउंडेशनचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.