जळगाव- देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. पण त्यांनी महाराष्ट्रात तिकीट वाटपात जसे राजकारण केले तसे बिहारमध्ये करू नये, असा सणसणीत टोला भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे हे फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवत असल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.
भुसावळ येथील भाजपचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या 'जनसेवेचा मानबिंदू: एकनाथराव खडसे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा आज दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या सोहोळ्यानंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपमध्ये युती आहे. त्यामुळे, आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो की त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे होऊ नये, अशा शब्दात खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढत आपली नाराजी बोलून दाखवली.
हेही वाचा- 'मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी पक्षाशी भांडत राहणार'