जळगाव - विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष तसेच अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत आज सायंकाळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले. २४ सप्टेंबरपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखनी/अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच १ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सहा दिवसांपासून परीक्षांबाबतची सर्व कामे ठप्प झाली आहेत. या परिस्थितीत ऑफलाईन व ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परीक्षा तुर्त पुढे ढकलाव्यात, अशी सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले.
कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय या परीक्षा घेणे शक्य नाही, असेही मत सदस्यांकडून मांडण्यात आले. त्यावर सर्वांनी आपापली मते नोंदवली. अखेर अंतिम वर्ष तसेच अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी सर्व सदस्यांचे मत जाणून या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले. परीक्षेच्या पुढील तारखा व नवीन वेळापत्रक आंदोलनाची परिस्थिती पाहून जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी दिली. या बैठकीत प्र- कुलगुरू, सर्व अधिष्ठाते, सहयोगी अधिष्ठाते व सदस्य उपस्थित होते.