जळगाव - भुसावळ शहर, रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसीसह जिल्ह्यातील १३० गावे व शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर धरणात, यंदा मे अखेरीस २५ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी तो अवघा ३.९२ टक्के होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हतनूरची स्थिती उत्तम आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०१८ मध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यात हतनूरची स्थिती अंत्यत बिकट झाली होती. मे अखेरीस धरणात अवघा चार टक्के जलसाठा होता. तर जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच धरणाने तळ गाठला होता. मात्र, गेल्या वर्षी विभागासह पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला.
पावसाळ्यात हतनूरसारखी २२ ते २५ धरणे भरतील इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पोस्ट मान्सून प्रकारातील या धरणात मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातही पाऊस झाल्याने, आवक जानेवारीपर्यंत कायम राहिली. यामुळे यंदा उन्हाळ्यात १३० गावे, प्रकल्पांची गरज पूर्ण करुन धरणात अद्यापही २५ टक्के साठा कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या काळात दीपनगर औष्णिक केंद्र बंद असून रेल्वेकडूनही पाण्याचा वापर कमी झाला आहे.
आयुध निर्माणी भुसावळ व वरणगावचा वापरही कमी होता. यासोबत एमआयडीसी जळगावचा वापरही महिनाभर बंद असल्याने हतनूर धरणात सुमारे २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.